संविधान सदनात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा आवाज – रायसोनीची अक्षया दानी

अटल बिहारी वाजपेयी व पंडित मदन मोहन मालवीय जयंतीनिमित्त राष्ट्रीय मंचावर रायसोनी महाविद्यालयाचा अभिमानास्पद सहभाग ; महाविध्यालयात घडले नेतृत्व, संसदेत मिळाला गौरव

जळगाव, ता. २९ : भारत रत्न माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील संसद भवनातील संविधान सदनात, संसद सचिवालय, लोकसभा अध्यक्ष कार्यालय तसेच भारत सरकारच्या Ministry of Youth Affairs & Sports यांच्या संयुक्त सहभागातून एका भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात देशभरातील ‘माय भारत’ या पोर्टलअंतर्गत निवड करण्यात आलेल्या ३६ तरुणांनी सहभाग नोंदवून आपल्या विचारांचे प्रभावी मांडणी केली.

या राष्ट्रीय स्तरावरील गौरवशाली मंचावर जळगाव येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या नामांकित स्वायत्त महाविद्यालयाची विद्यार्थिनी अक्षया दानी हिने संसदेत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जीवनकार्य व राष्ट्रउभारणीतील योगदानावर तीन मिनिटांचे सर्वोत्कृष्ट आणि प्रभावी भाषण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष बाब म्हणजे, विविध टप्प्यांतील कठीण निवड प्रक्रियेतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अक्षया दानीला प्राप्त झाली होती, ही बाब रायसोनी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.

दिल्लीहून परतल्यानंतर अक्षया दानी हिचे जी. एच. रायसोनी महाविद्यालयात जंगी व उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कौतुक समारंभात महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अक्षयाच्या यशाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “अक्षया हिच्या या राष्ट्रीय पातळीवरील निवडीमुळे जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे नाव थेट संविधान भवनापर्यंत पोहोचले आहे. अक्षयाचा आत्मविश्वास, विचार मांडणीची क्षमता आणि नेतृत्वगुण खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, टोस्टमास्टर्स क्लब व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांसारख्या उपक्रमांमध्ये अक्षयाचा सक्रिय सहभाग असल्याने तिच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठा फायदा झाला. संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलजी रायसोनी यांचे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर व्यावहारिक आणि राष्ट्रीय पातळीवर सक्षम घडविण्याचे व्हिजन असल्यामुळेच अक्षयासारख्या विद्यार्थिनी येथे घडत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अक्षया दानीच्या या यशामुळे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय, जळगाव या संस्थेचा शैक्षणिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय पातळीवरील दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, हे यश विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण