विद्यापीठस्तरीय “युवारंग”साठी जी. एच. रायसोनी महाविद्यालय सज्ज ; ८ ऑक्टोबरला उद्घाटन

पाच दिवसीय महोत्सवात तब्बल १८०० विद्यार्थी उलगडणार असंख्य कलाविष्कारांचा अविस्मरणीय सोहळा ! ; पत्रकार परिषदेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत आनंद व्यक्त करत दिली माहिती.

जळगाव, ता. ६ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा “रौप्य युवारंग महोत्सव” ता. ८ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित केला जात आहे.

ता. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रौप्य युवारंग महोत्सवाचे भव्य उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाचे औचित्य महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. श्री. गिरीशजी महाजन यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय एल. माहेश्वरी विराजमान राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे व युवारंग समन्वयक प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते.   

रौप्य युवारंग : २५ वर्षांचा गौरव

‘युवारंग’ म्हणजेच तरुणाईच्या कलेचा, उत्साहाचा आणि प्रतिभेच्या तेजाचा महोत्सव. या रंगोत्सवातून नव्या पिढीच्या स्वप्नांना दिशा मिळते आणि सृजनशीलतेच्या क्षितिजावर नवे सूर्योदय घडतात. गेल्या पंचवीस वर्षांत या व्यासपीठाने अनेक नामवंत कलाकार, लेखक, साहित्यिक व सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांना घडवले आहे. यंदाचे वर्ष हे युवारंगच्या रौप्यमहोत्सवी पर्वाचे सुवर्णपान ठरणार असून तरुणाईच्या कर्तृत्वाचा हा रौप्यमहोत्सवी सोहळा भव्य, दिव्य आणि अद्वितीय सांस्कृतिक तसेच राष्ट्रीय वारशाच्या गौरवाने सुशोभित होणार आहे.

‘वंदे मातरम् १५०’ संकल्पना केंद्रस्थानी

२०२५ चा युवा महोत्सव ‘वंदे मातरम् – १५०’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा देणाऱ्या, क्रांतीची ज्वाला पेटविणाऱ्या आणि राष्ट्रभक्तीच्या चेतनेला आकार देणाऱ्या बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला आणि त्याच्या जननी असलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत, यंदाचा युवारंग महोत्सव कलात्मकतेचा, संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा भव्य महासंगम ठरेल, असे आयोजकांनी सांगितले.

महोत्सवात रंगणार “आनंदमठ”चा भव्य नाट्यप्रयोग !

विनिता तेलंग लिखित आणि रवींद्र सातपुते दिग्दर्शित "आनंदमठ" हे मराठी संगीत नाटक बंकिमचंद्र चटर्जी यांच्या सुप्रसिद्ध बंगाली कादंबरी ‘आनंदमठ’ वर आधारित आहे. यंदा या कादंबरीच्या प्रकाशनाला १५० वर्षे पूर्ण होत असून, त्याच “युवारंग” महोत्सवाच्या संकल्पनेवर आधारित हे नाट्य विशेष सादरीकरणासाठी निवडले गेले आहे. दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी, सर्व विद्यार्थ्यांची नावनोंदणी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता, हे मराठी संगीत नाटक जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृह’ (रंगमंच क्रमांक १) येथे रंगणार आहे. या नाट्यप्रयोगाने मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवून आपली कलात्मक आणि सांस्कृतिक श्रेष्ठता सिद्ध केली आहे.

भव्य रंगमंचाना समाजसुधारक कवींची नावे समर्पित

सहभागी युवा कलाकारांना त्यांच्या उपजत कलागुणांची सादरीकरण करण्याची संधी देण्यासाठी भव्य रंगमंच तयार करण्यात आले आहेत. या रंगमंचांना ‘वंदे मातरम् – १५०’ या मध्यवर्ती संकल्पनेनिमित्त समाजसुधारक कवींचा गौरव करत विविध नावे देण्यात आली आहेत. त्याप्रमाणे: रंगमंच क्रमांक १ : बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृह, रंगमंच क्रमांक २ : स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, रंगमंच क्रमांक ३ : कवी प्रदीप सभागृह, रंगमंच क्रमांक ४ : कवी प्रेम धवन सभागृह, रंगमंच क्रमांक ५ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह या भव्य रंगमंचांवर युवक-युवतींच्या प्रतिभावंत सादरीकरणातून महोत्सवाची कला, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीची झलक दिसून येणार आहे.

५ कलाप्रकार ; २७ स्पर्धा

महोत्सवात सहभाग घेणार्‍या महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन ८ ऑक्टोबरला होणार आहे. ९ ते ११ ऑक्टोबरपासून सकाळी आठ वाजता पाच रंगमंचावर २७ उपकला प्रकारात विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्यात,

९ रोजी : मिमिक्री, मूकनाट्य, समूह गीत (भारतीय), वक्तृत्व, स्थळचित्र, भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीत (स्वरवाद्य), भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीत (तालवाद्य).

१० रोजी : स्कीट, पाश्चिमात्य समूहगान, वाद‌विवाद, चिकट कला, भारतीय शास्त्रीय गायन-एकल, भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, माती कला, पाश्चिमात्य गायन-एकल, एकांकिका, स्थळ छायाचित्रण, पाश्चिमात्य वाद्यसंगीत-एकल

११ रोजी : भारतीय लोक समूहनृत्य, भारतीय शास्त्रीय नृत्य, पोस्टर मेकिंग,भारतीय नाट्यसंगीत-एकल, रांगोळी, स्थळ छायाचित्रण- अंतिम फेरी, भारतीय सुगम संगीत, इन्स्टॉलेशन, मेहंदी हे कलाप्रकार आयोजित केले जाणार आहे.

महोत्सवात प्रथमच एकांकिका स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना आणि अभिनय क्षमतेला प्रकट करण्याची संधी देण्यासाठी दरवर्षी कबचौउमवि बहिणाबाई करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा स्वतंत्रपणे आयोजित केली जात असे. परंतु यंदा ही स्पर्धा युवारंग महोत्सव २०२५ मध्ये समाविष्ट केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पुरस्काराचे स्वरूप असे आहे – प्रथम: रु. ७,००१/- रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय: रु. ५,००१/- रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय: रु. ३,००१/- रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ: रु. २,००१/- रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र या बक्षिसांद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला गौरव मिळणार असून, या महोत्सवात त्यांचे एकत्रित व कलात्मक सादरीकरण अधिक प्रभावी आणि संस्मरणीय ठरणार आहे.

विविध समित्या, ११ महाविद्यालयांचा सहभाग

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी युवारंग महोत्सवासाठी २५ समित्या  बनविल्या आहेत. मुलींसाठी निवासाची सोय महाविद्यालयातील मुलींच्या वस्तीगृहात तर मुलांसाठी स्वतंत्र इमारतीत केली आहे. भोजनाची व्यवस्था रायसोनी महाविद्यालयाच्या आवारातच केली आहे. ११महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला असून व्यवस्थापकांसह एकूण १८०० विद्यार्थ्यांची संख्या झाली आहे.

विध्यार्थी सहभाग : ५०७, विध्यार्थिनी सहभाग: ८०९, पुरुष साथीदार: ११९, महिला साथीदार: ५०, पुरुष संघ व्यवस्थापक: १३०, महिला संघ व्यवस्थापक: १०४, व सांस्कृतिक समन्वयक: ३० शी नोंद महाविद्यालयांनी केली आहे. वक्तृत्व स्पर्धांबाबत आदल्या दिवशी सहभाग घेणार्‍यांना विषय दिला जाईल. परीक्षकांची नियुक्ती विद्यापीठ करणार असून विद्यापीठाच्या बाहेरील परीक्षक नियुक्त केले जाणार आहे.

दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता, रंगमंच क्रमांक १ वर ‘युवारंग’ महोत्सवाचा पारितोषिक वितरण व समारोप सोहळा भव्य उत्साहात पार पडणार आहे. या समारोप सोहळ्याला केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ व जळगाव शहराचे आमदार श्री.राजुमामा भोळे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाला कलात्मक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त होणार आहे. या सोहळ्यात विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच युवारंगच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधींचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक सादरीकरणाने आणि राष्ट्रगीताने होईल.

यावेळी अधिक माहिती देतांना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या म्हटल्या कि, युवा ज्या विद्यापीठस्तरीय महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत होते, अशा युवारंग महोत्सवात एकाचवेळी पाच स्टेजवर नृत्य, नाटक, संगीत, साहित्य आणि विविध २७ कलाप्रकारांचा महासंगम होणार आहे, संपूर्ण कॅम्पस कला, उत्साह आणि स्पर्धेच्या जल्लोषात यावेळी रंगणार असून हा रौप्य महोत्सव विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशीलतेला, प्रतिभेला आणि आत्मविश्वासाला सादर करण्याची निश्चितच सुवर्णसंधी देईल. अन हे आयोजन आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरेल. तसेच यावेळी कलात्मकतेचा, संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा समृद्ध संग्रह या महोत्सवात पाहायला मिळणार असून सर्व स्पर्धक व प्रेक्षकांनी या युवारंग महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश