जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला गती देणाऱ्या “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन”चे भव्य उद्घाटन

विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या एआय एजंटद्वारे स्पर्धेचा डिजिटल शुभारंभ ; महाविद्यालयीन स्तरावरील निवड फेरीत १३४ संघाची चमकदार कामगिरी 

जळगाव, ता. २६ : “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन” या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे महाविद्यालयीन स्तरावरील प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. या प्राथमिक फेरीचे उद्दिष्ट महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट ३० संघांची निवड करून त्यांना पुढील फेरीसाठी नामांकित करणे असे होते. ही स्पर्धा ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) व केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल यांच्या सहाय्याने आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना, सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन देणे हे या स्पर्धेचे मुख्य ध्येय आहे. या प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले असून विविध क्षेत्रातील समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेतून सुमारे ३० प्रकल्पांची निवड करण्यात आली असून हे संघ आता पुढील टप्प्यात महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या संकल्पना राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळणार असून भविष्यातील स्टार्टअप्स आणि नवकल्पनांसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, डेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील, तसेच स्पर्धेचे परीक्षक श्री. राजेश ठाकरे, श्री. अजिंक्य तोतला, डॉ. सारंग बारी, डॉ.  समीर पाटील, श्री. सागर पाटील, श्री. हितेश अग्रवाल, श्री. हिरेंद्र वल्हे, श्री. प्रसाद नेवे उपस्थित होते. एआय एजंटच्या इनोव्हेटीव्ह तंत्रज्ञानाचा वापर करत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. या वेळी सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले की, “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही देशभरातील विद्यार्थ्यांसाठी नवनिर्मिती आणि कल्पकतेला चालना देणारे एक सकारात्मक व्यासपीठ आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार ही स्पर्धा प्राथमिक स्तरावर रायसोनी इस्टीट्युट येथे घेतली जात असून नुकतीच मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्रात प्रथमच रायसोनी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. तसेच स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात आमच्या महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकी विभाग या दोन्ही संघांनी देशभरातील स्पर्धकांना मागे टाकत प्रत्येकी एक-एक लाख रुपये रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळवत प्रथम क्रमांक पटकावला होता. ही संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली. यावर्षीही आमचे दोन्ही संघ या यशाची परंपरा कायम राखण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून, स्पर्धेतील सर्व प्रॉब्लेम स्टेटमेंट्सचे सखोल अध्ययन करून विद्यार्थ्यांना ताकदीने प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे परिपूर्ण कौशल्य, इनोव्हेटीव्ह माइंडसेट आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असून विद्यार्थी या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेत मागील वर्षीप्रमाणेच त्याच उत्साहाने आणि ताकदीने काम करून महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करतील,  असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत म्हणाले की, “मागील काही वर्षांपासून हॅकेथॉन स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्प सादरीकरणांमधून शिकण्याची उत्तम संधी मिळते. त्यांच्या ज्ञानात मोठी भर पडते, ज्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. यानंतर डेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही देशभरातील नामांकित संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. यात लाखो विद्यार्थी सहभागी होत असून आपल्या नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत, ज्यामुळे मानवी जीवन अधिक सुखकर व सोयीस्कर होऊ शकते

या स्पर्धेसाठी प्रा. डॉ. हर्षल कोतकर यांनी मुख्य समन्वयकाची जबाबदारी सांभाळली, तर प्रा. डॉ. निलेश इंगळे, प्रा. डॉ. चेतन चौधरी आणि प्रा. रश्मी झांबरे यांनी सहसमन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्वांचे कौतुक केले व भविष्यातही अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचे स्वरूप

देशातील तरुणांमध्ये नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध समस्या सोडवण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१७ साली स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) या स्पर्धेची सुरुवात झाली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना समाज, संस्था आणि शासनाच्या गंभीर समस्यांच्या निराकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक देशव्यापी उपक्रम आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे जगातील सर्वात मोठे नाविन्यपूर्ण व्यासपीठ मानले जाते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनांची संस्कृती रुजवणे, समस्यांचे प्रभावी निराकरण करणे आणि उत्पादन विकासातील सर्जनशीलता वाढवणे हा आहे.

स्पर्धेची रचना :- या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारत सरकारच्या विविध मंत्रालयांद्वारे कृषी, शिक्षण, पर्यटन, वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग, संरक्षण, वित्त, आरोग्य व कुटुंब कल्याण, गृह, माहिती आणि प्रसारण आदी त्यांना भेडसावणाऱ्या वास्तविक समस्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या पोर्टलवर प्रदर्शित केल्या जातात. विद्यार्थी या समस्यांवर क्रिएटिव्ह, टिकाऊ आणि सामाजिक सलोख्याच्या कल्पना सादर करतात.

आयडिया सबमिशन प्रक्रिया :- आयडिया सबमिशनमध्ये केवळ ५०० कल्पनांना प्राथमिक फेरीत स्वीकारण्यात येते व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कल्पनांचे तज्ज्ञांकडून मूल्यांकन केले जाते. मूल्यांकनासाठी कल्पनेची नवीनता, दीर्घकालीन प्रभाव, वापरकर्ता अनुभव, भविष्यातील उत्कृष्टतेची क्षमता, जटिलता, व्यवहार्यता, टिकाऊपणा या सर्वांचे मुल्यांकन केले जाते मूल्यांकनानंतर प्रत्येक समस्या निवेदनासाठी (Problem Statement) सुमारे ४ ते ५ संघांची निवड केली जाते, जे पुढे भव्य अंतिम फेरीत स्पर्धा करतात.

३० तासांची प्रोग्रॅमिंग स्पर्धा

* ही स्पर्धा ३० तास अखंड चालणारी संगणक प्रोग्रॅमिंग स्पर्धा आहे.

* देशभरातील विकासक (Developers) आणि प्रोग्रॅमर यांना परीक्षक म्हणून आमंत्रित केले जाते.

* स्पर्धा वेळेच्या मर्यादेमुळे अनेक विद्यार्थी संघ रात्रंदिवस प्रकल्पांवर काम करतात.

* विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर सखोल लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते तसेच नवकल्पनांबद्दल सर्जनशील विचार करण्यास प्रवृत्त केले जाते.

या प्रक्रियेच्या माध्यमातून देशातील विविध समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण, तांत्रिक आणि व्यावहारिक उपाय तयार होतात आणि विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करतात. 

राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत आकर्षक पारितोषिकांची संधी

राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीत, सर्वोत्कृष्ट व समाजोपयोगी सोल्युशन सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके दिले जातात. यामध्ये खालीलप्रमाणे पारितोषिके प्रदान केली जातात.

* प्रथम पारितोषिक :- ,००,००० (एक लाख रुपये)

* द्वितीय पारितोषिक :- ७५,००० (पंचाहत्तर हजार रुपये)

* तृतीय पारितोषिक :- ५०,००० (पन्नास हजार रुपये)

ही पारितोषिके विद्यार्थ्यांना नवीन कल्पना व नाविन्यपूर्ण प्रकल्प विकसित करण्यासाठी प्रेरणा देतात, तसेच तांत्रिक कौशल्यांचा विकास घडवून आणतात.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश